✍️दिनेश झाडे
मुख्य संपादक
राजुरा:-राष्ट्रीय काँग्रेसचे नेते जननायक खासदार राहुलजी गांधी यांनी देशाच्या संसदेत तसेच भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून आणि रस्तावर उतरून वारंवार जातीय जनगणना करण्यात यावी अशी सातत्याने मागणी करीत जन आंदोलने केली व आवाज उठवला सुरवातीला मोदी सरकार आणि भाजपच्या लोकांनी त्यांची खिल्ली उडवली, त्यांची अवहेलना केली मात्र शेवटी या सरकारला त्यांच्या या न्याय्य मागणीची व त्यांच्या मागणीला मिळणाऱ्या व्यापक जनसमर्थनाची दखल घ्यावी लागली. देर आये दुरुस्त आये म्हणून काहीही का होईना जनसामान्यांच्या हितासाठी हा निर्णय आवश्यक होता या निर्णयाचे चंद्रपूर जिल्हा काँग्रेसच्या वतीने आणि जिल्ह्यातील समस्त जनतेच्या वतीने मी मनापासून स्वागत करतो असे मत चंद्रपूर जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार सुभाष धोटे यांनी व्यक्त केले आहे.
ते पुढे म्हणाले की, देशात सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातनिहाय जनगणनेचा निर्णय ऐतिहासिक निर्णय आहे. आता एक कालबद्ध कार्यक्रम हाती घेऊन केंद्र सरकारने या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी करावी. तसेच जनगणनेची जातीनिहाय वस्तूनिष्ठ आकडेवारी आणि कोण कोणत्या क्षेत्रात विशेषतः शासकीय लाभाच्या ठिकाणी प्रत्येक जाती समुहाचे किती आणि काय योगदान आहे, सर्वांना न्याय मिळतो आहे की नाही याची माहिती जाहीर करण्यात यावी. यामुळे सर्व समाजघटकांना त्यांचे न्याय्य हक्क मिळवून देण्यास मदत मिळेल. यातून येणाऱ्या आकडेवारीवरून सामाजिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या विकासासाठी सरकारला अधिक निधी व आवश्यक उपाययोजना आखून सर्व घटकांचा समान विकास साधता येईल. त्यामुळे मागास, वंचित समाजघटकांचा सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक आणि अन्य स्तर उंचावण्यास मदत होईल आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी, महात्मा ज्योतिबा फुले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यासह भारतातील समस्त सुधारणावादी महामानवाच्या स्वप्नील सामाजिक समता प्रस्थापित करण्याचे ध्येय प्राप्त करता येईल. जातीनिहाय जनगणना होत नसल्याने अनेक समाजातील नागरिकांच्या विकास योजनांवर परिणाम होत होता आता जातीनिहाय जनगणना तातडीने पूर्ण झाल्यावर केंद्र तसेच राज्य सरकारला तळागाळातील वंचित घटकांपर्यंत विकास योजना पोहचवून सर्वांना समान न्याय देणे शक्य होणार आहे असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.↕️↕️↕️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️

