💢स्व. सिंधुताई सपकाळ शैक्षणिक दत्तक योजना अंतर्गत “एक हात मदतीचा”
✍️दिनेश झाडे
मुख्य संपादक
भद्रावती:-चंद्रपूर जिल्ह्यातील गरजू, अनाथ आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बळ अशा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजांची पूर्तता करण्यासाठी झटणाऱ्या स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरियल रविंद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्ट च्या वतीने आज एक अत्यंत स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला. स्व. सिंधुताई सपकाळ शैक्षणिक पाल्य दत्तक योजना अंतर्गत ट्रस्टकडून शैक्षणिक दत्तक घेतलेल्या विद्यार्थ्यांना नव्या शैक्षणिक सत्रासाठी (2025-26) शालेय साहित्य, पाठ्यपुस्तके, वह्या, पेन, पेन्सील तसेच शालेय गणवेशाचे मोफत वितरण करण्यात आले.

या उपक्रमाचा शुभारंभ शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) चे चंद्रपूर जिल्हाप्रमुख व ट्रस्टचे संस्थापक मा. रविंद्र शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला. या प्रसंगी ट्रस्टचे अध्यक्ष प्रा. धनराज आस्वले आणि कोषाध्यक्षा सुषमाताई शिंदे यांचे विशेष उपस्थितीत लाभले.
🔰मा. रविंद्र शिंदे हे गेल्या अनेक वर्षांपासून समाजसेवेच्या क्षेत्रात कार्यरत असून, गरजूंच्या मदतीसाठी सदैव तत्पर राहणारे एक प्रगल्भ आणि कृतिशील नेतृत्व म्हणून त्यांची ओळख आहे. वैद्यकीय मदत, कॅन्सर रुग्णांना आर्थिक सहकार्य, दिव्यांगांना तीनचाकी सायकल वाटप, वाचनालयांना स्पर्धा परीक्षेसाठी आवश्यक पुस्तकांचे वाटप, तसेच विविध आरोग्य शिबिरांचे आयोजन यासारख्या अनेक उपक्रमांच्या माध्यमातून त्यांनी समाजाच्या प्रत्येक घटकाला आधार दिला आहे.
स्व. सिंधुताई सपकाळ शैक्षणिक दत्तक योजना ही ट्रस्टची विशेष ओळख ठरलेली आहे. या योजनेअंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यासह इतर जिल्ह्यांमधील गरजू मुले-मुली दत्तक घेऊन त्यांना मोफत शिक्षण, शालेय साहित्य, फि भरपाई आणि आवश्यक ती शैक्षणिक मदत केली जाते. 2021 पासून ट्रस्टने या योजनेअंतर्गत अनेक विद्यार्थ्यांचे जीवन उजळवले आहे. शिक्षणासाठी संघर्ष करणाऱ्या कुटुंबांना हक्काचा आधार देणारा हा उपक्रम समाजात सकारात्मक बदल घडवून आणत आहे.
आजच्या कार्यक्रमात शैक्षणिक दत्तक घेतलेल्या विद्यार्थ्यांचे पालक आणि सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे, कृतज्ञतेचे भाव स्पष्टपणे दिसून येत होते. हा उपक्रम फक्त मदतीपुरता मर्यादित न राहता विद्यार्थ्यांच्या आयुष्यात प्रेरणादायी आणि दिशा देणारा ठरतो आहे.
स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरियल रविंद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्ट च्या या कार्याची दखल घेत संपूर्ण जिल्ह्यातून विविध स्तरांमधून कौतुकाचा वर्षाव होत आहे. समाजासाठी योगदान देण्याची प्रेरणा असणाऱ्यांसाठी हा एक आदर्श उपक्रम ठरत आहे.
⏯️रविंद्र शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ट्रस्टने उभ्या केलेल्या समाजोपयोगी कार्यप्रणालीमुळे, गरजू आणि वंचित घटकांना केवळ आर्थिक मदतच नव्हे तर मानवी सन्मानाची आणि आत्मभरोसाची जाणीव दिली आहे. शिक्षणाचा प्रकाश सर्वांपर्यंत पोहोचावा, ही त्यांची दूरदृष्टी व जाणीव या कार्यातून प्रकर्षाने दिसून येते.

